प्रयागराज दुर्घटनेबाबत मोठी अपडेट! अंघोळीसाठी गेलेल्या 7 जणापैकी 4 जणांचा मृत्यू तर 3 जण बचावले

पुणे : उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातील मांडा परिसरात शुक्रवारी एक मोठी दुर्घटना घडली. या भागातील बामपूर गावाजवळ गंगा नदीत आंघोळीसाठी गेलेली सात मुलं बुडाली होती. याबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेतील चार मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे तर तीन मुलांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आल आहे.

नेमकं काय घडलं?
शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास बामपूर गावाजवळ गंगा नदीत अंघोळ करण्यासाठी ही सात मुले गेली होती.अचानक ते खोल पाण्यात गेले आणि बुडाले. यावेळी या मुलांचा आवाज ऐकून जवळचे मच्छीमार घटनास्थळी धावून गेले आणि बचावकार्य सुरू केले. यावेळी मोहित, दिव्यांशू आणि अमन यांना सुखरूप वाचवण्यात आलं. मात्र, कुणाल, निहाल, दीपक आणि ऋषभ गंगेच्या लाटांमध्ये वाहून गेले. बऱ्याच प्रयत्नांनंतर कुणाल आणि दीपक यांचे मृतदेह सापडले.

या घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलीस घटनास्थळी पोहचले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृत मुलांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री योगी यांनी प्रयागराजमधील या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला. तसंच मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदतकार्याला गती देण्याचे निर्देश दिले आहेत.नदीत बुडून मृत पावलेल्या मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात आहे.