वीज ग्राहकांना मोठा दिलासा! लाईटबील तब्ब्ल ‘इतक्या’ टक्क्यांनी होणार कमी, जाणून घ्या…

पुणे : वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यातील वीज ग्राहकांसाठी वीजदर ठरवण्यासाठी महावितरणने दाखल केलेल्या याचिकेवर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने निर्णय दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत राज्यात वीज दरात मोठी कपात होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. महावितरण कंपनीने वीज दर कमी करण्यासाठी केलेल्या याचिकेवर महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगने निर्णय देत वीज दरात टप्प्याटप्प्याने कपात करण्याचे आदेश दिले आहेत.
फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार, राज्याच्या इतिहासात प्रथमच महावितरण कंपनीने वीज दर कमी करण्याची याचिका सादर केली होती. याआधी अनेकदा वीज दरवाढीसाठी याचिका दाखल केल्या जात असतानाच, यावेळी मात्र ग्राहकांनाच दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयानुसार पहिल्या वर्षी १०% दरकपात होणार असून, पुढील पाच वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने एकूण २६% वीज दर कपात होणार आहे. ही दर कपात केवळ घरगुती ग्राहकांपुरती मर्यादित नसून, औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांनाही याचा थेट लाभ होणार आहे. राज्यात १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांचे प्रमाण जवळपास ७० टक्के आहे.
त्यामुळे हे ग्राहक या निर्णयामुळे सर्वाधिक लाभार्थी ठरणार आहेत. फडणवीस यांनी पुढे सांगितले की, राज्य सरकार मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत दिवसा शाश्वत वीजपुरवठा देण्यासाठी काम करत आहे. तसेच, हरित ऊर्जा स्रोतांमधून वीजखरेदी वाढवण्यावर भर दिल्यामुळे वीजखरेदी खर्चात बचत होईल आणि याचमुळे वीज दर कपात शक्य झाली आहे.