मोठी बातमी! तेलंगणा सीमा भागातील गावांचा प्रश्न सुटला, मुख्यमंत्र्यांचा ऐतिहासिक निर्णय, महाराष्ट्रात होणार समावेश…

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र आणि तेलंगणा सीमाभागातील १४ गावांचा वाद अखेर संपला आहे. यामुळे हा एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या निर्णयामुळे संबंधित गावांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत निर्णय घेतला आहे.

यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा आणि जिवती तालुक्यांत ही गावे समाविष्ट होणार आहेत. याबाबत गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. याबाबत आज महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात या विषयावर बैठक झाली. या बैठकीला आमदार देवराज भोंगळे, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा, तसेच १४ गावांतील ग्रामस्थ उपस्थित होते.
या गावांचा प्रशासनिक, महसुली आणि सामाजिक वाद सुरू होता. ही गावे महाराष्ट्राच्या हद्दीत असूनही व्यवहार तेलंगणा राज्यात होत होते. आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्णयामुळे गावांना राज्याच्या योजनांचा थेट लाभ मिळणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

आजच्या या बैठकीत गावांचा महाराष्ट्रात समावेश करण्याचा अंतिम निर्णय झाला. या गावांमध्ये परमडोली, परमडोली तांडा, कोठा (बु. व खु.), लेंडीगुडा, मुकादमगुडा, लेंगीजाळा, महाराजगुडा, अंतापूर, इंदिरानगर, शंकरलोधी, पद्मावती, भोलापठार, येसापूर आणि परसगुडा यांचा समावेश होणार आहे.
यानंतर या गावांना सर्व शासकीय योजना, आरोग्य, शिक्षण, आणि नागरी सुविधांचा लाभ दिला जाणार आहे. ही १४ गावं महाराष्ट्राचीच आहेत. त्यांची मतदार यादी महाराष्ट्रात आहे आणि महसुली नोंदी देखील राज्याच्या आहेत. त्यामुळे गावठाण महाराष्ट्रात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, महसूलमंत्री बावनकुळे यांनी याबाबत माहिती दिली.
यासंबंधी अधिकृत अधिसूचना लवकरच जारी होणार आहे. सीमावादामुळे मराठी माणसाच्या हक्काला अडथळा येता कामा नये, ही सरकारची भूमिका आहे. बेळगावप्रमाणेच इथेही ठोस निर्णय घेतला जाईल. मराठी शिक्षण, नागरिकांना ओळख, आणि शासकीय मदत यासाठी पुढील पाऊल उचलले जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे.