मोठी बातमी! चंद्रपुरात गेल्या 72 तासांत 5 महिलांचा मृत्यू, वाघाच्या दहशतीने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

चंद्रपूर : गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्याच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. आता पुन्हा एका महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. चंद्रपूरच्या मूल तालुक्यातील भादूरणा येथे तेंदूपत्ता तोडणाऱ्या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
भूमिका दीपक भेंदारे असं वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र या घटनेने परिसरात मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला आहे. आपल्या पती आणि गावातील इतर लोकांसोबत त्या सकाळी जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या.
यावेळी जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला. याठिकाणी वाघाच्या हल्ल्यात गेल्या 3 दिवसात तेंदूपत्ता तोडणाऱ्या 5 महिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 10 मे रोजी सिंदेवाही तालुक्यातील मेंढा-माल येथे तेंदूपत्ता तोडणाऱ्या 3 महिलांचा तर काल मूल तालुक्यातील महादवाडी येथे एका महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.
घटनेनंतर काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून हल्लेखोर वाघिणीचा तात्काळ बंदोबस्त करण्याची आणि अशा दुर्दैवी घटना यापुढे घडू नये, याकरिता विशेष उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या 3 महिलांच्या अंत्यसंस्कारात ते सहभागी झाले होते.
असे असताना मात्र या घटनेला काही तास उलटत नाही तोच पुन्हा एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे अजून किती नागरिकांचा जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येणार आहे? असा सवाल आता नागरिकांकडून विचारला जाऊ लागला आहे. यामुळे याकडे सरकारने लक्ष देणे आवश्यक आहे.