केंद्रीय गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय, सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचं नाव बदललं, आजपासून ईश्वरपूर नवं नाव

सांगली : गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचं नामांतर ईश्वरपूर करण्यात यावं, अशी मागणी सातत्याने अनेक जणांकडून करण्यात येत होती. यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाला नामांतर बदलाची मागणी देखील पाठवण्यात आली. अखेर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत निर्णय घेतला आहे.निवडणुकांआधी इस्लामपूरचं नाव बदलण्यात आलं आहे. आजपासून इस्लामपूर या शहराचा नवं नाव ईश्वरपूर असं ठेवण्यात आल आहे.याबाबत आजच अध्यादेश निघाला आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठवलेला प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयाने मान्य केला आहे. त्यामुळे इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर राहणार असल्याची अधिसूचना आजच जाहीर झाली आहे. आजपासून इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर करण्यात आलं आहे, असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधीमंडळाच्या सभागृहात अनेकवेळा याबाबत मागणी केली होती. जनतेने वारंवार इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर करा, असं निवेदन दिलं होतं. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला होता. गृह मंत्रालयाने ही मागणी मान्य केली. कोण विरोध करतं याला अर्थ नाही. जनतेची मागणी होती. ती मागणी मान्य झाली. महाराष्ट्र सरकारची मागणी केंद्रीय गृहमंत्रालयाने मान्य केली. त्यामुळे ईश्वरपूर हे नाव आलेलं आहे. इस्लामपूरचं नाव बदललं , असं बावनकुळे म्हणाले आहेत.

