पुण्यातील धायरीतील ग्रामस्थांचा मोठा निर्णय! वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर सगळेच खडबडून जागे..

पुणे : पुण्यात वैष्णवी हगवणे या विवाहित महिलेने आपले जीवन संपवल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून गेला आहे. हुंड्यासाठी छळ होऊन ही घटना घडली आहे. यानंतर हुंड्यासारख्या प्रथेला मोडीस काढण्यासाठी पुण्यातील ग्रामस्थांनी पाऊल उचलले आहे. नो प्री-वेडिंग, नो मानपान, पत्रिका नाही पाहिली तरी चालेल, पण मुलांची आरोग्य तपासणी करा, असा महत्त्वपूर्ण निर्णयच धायरी येथील ग्रामस्थांनी घेतला आहे,
यामुळे आता सामाजिक परिवर्तनाची एक नवीन लाट सुरू झाली आहे. ही अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी पुण्यातील धायरी ग्रामस्थांनी ‘एल्गार’ केला आहे. धायरी येथे आयोजित ग्रामसभेत मराठा, बहुजनांसह अठरापगड जातीच्या ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. या ग्रामसभेत सर्वांनी एकमताने ‘हुंडा न देणे आणि हुंडा न घेण्याचा’ ठराव मंजूर केला.
यामुळेयेणार्या काळात अशा घटनांना लगाम बसेल. यावेळी लग्नातील अनेक चुकीच्या प्रथा बदलण्याचे महत्त्वपूर्ण ठरावही यावेळी मंजूर करण्यात आले. तसेच फोटोग्राफर आणि मेकअप आर्टिस्ट यांनाही याबाबत समज देण्यात यावी, असे ठरले आहे. चुकीच्या प्रथा बंद करून मुलगा आणि मुलगी कसे सुखी राहतील, याचा विचार करावा, असा महत्त्वपूर्ण ठराव या ग्रामसभेत करण्यात आला.
एकवेळ पत्रिका नाही पाहिली तरी चालेल, पण मुलांची शारीरिक आरोग्य तपासणी करूनच लग्ने ठरवावीत, यावर विशेष भर देण्यात आला. लग्नात काय दिले आणि काय नाही, याची चर्चा करू नये. सोने, चांदी आणि आहेर यांचा उल्लेख टाळावेत. असेही ठरवण्यात आले आहे. जर प्री-वेडिंगचे फोटो किंवा व्हिडिओ लग्नात स्क्रीनवर दाखवले, तर प्रतिष्ठित व्यक्ती विवाह सोहळा सोडून निघून जातील, असेही सांगितले आहे.
तसेच आदर्श विवाह घडवून आणणाऱ्या कुटुंबाचा सन्मान करण्यात यावा, असाही ठराव या ग्रामसभेत मंजूर झाला. या ठरावांचे फलक गावात लावण्यात यावेत, जेणेकरून सर्वांना त्याची माहिती होईल. असा ठराव करण्यात आला आहे. पुणे भागात हे प्रकार जास्त होत असून याठिकाणीच अशा प्रकारे विवाह सोहळे होतात.
यामुळे आता याच ठिकाणी असे निर्णय होत असल्याने येणाऱ्या काळात इतर ठिकाणी देखील अशा प्रकारे घटना घडणार नाहीत, असा हेतू यामागे आहे. सध्या बडेजाव करून मोठ्या प्रमाणावर विवाहसोहळे केले जात आहेत. यामुळे याचे अनेक परिणाम होत आहेत.