निवडणुकीच्या आधी जरांगेना भेटायला 10-10 मंत्री यायचे, आता 5 दिवस झाले एकही मंत्री हजर नाही, सरकारच्या मनात नेमकं काय?

मुंबई : सध्या मुंबईत मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे उपोषण करत आहेत.
मराठा आंदोलनाचा आज पाचवा दिवस असूनही आंदोलकांशी संवाद साधण्यास चर्चा करण्यास सरकारकडून एकही प्रतिनिधी येत नसेल किंवा तोडगा काढण्याचा प्रयत्न होत नसेल तर सरकारची ही भूमिका योग्य आहे का? असा सवाल आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

गेल्या वेळेस निवडणुका होत्या तर १०-१० मंत्री यायचे आणि आता मात्र आंदोलकांना वाऱ्यावर सोडताय? एकीकडे आंदोलकांशी चर्चा करायची नाही आणि दुसरीकडे मात्र जाणूनबुजून आंदोलन बदनाम करून आंदोलनाची सहानुभूती कमी करण्यासाठी कटकारस्थाने रचायची, नेरेटिव्ह सेट करायचा हे सरकारमधील काही नेत्यांना शोभतं का? असेही ते म्हणाले.

तसेच आंदोलक युवांना विनंती आहे ‘चुकुनही चूक करू नका’ कारण हे गेंड्याच्या कातडीचं सरकार केवळ संधी शोधत आहे. सर्वांनी शांतता ठेवत नियम पाळायलाच हवेत. सरकारनेही केवळ बघ्याची भूमिका न घेता चर्चा करत तत्काळ तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

मुख्यमंत्री गणपती दर्शनात व्यस्त आहेत, एक उपमुख्यमंत्री गावाला जाऊन बसलेत तर दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांचा पत्ताच नाही. एवढा संवेदनशील प्रश्न असताना हे सरकार अजूनही झोपेचं सोंग का घेत आहे? असेही आमदार रोहित पवार म्हणाले. यामुळे सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
