बाळा, आपण सर्वांना न्याय देऊ… निधनापूर्वी अजित दादांचा शेवटचा फोन कॉल कोणाला?, कार्यकर्त्याचा मोठा खुलासा…

बारामती : राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूचं गुढं काय? असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे.

अशातच आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रश्न विचारले जातायेत. विशेष म्हणजे अजित पवार गटाचे नेते देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करत असल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. अशातच आता अजित पवार यांची अखेरच्या फोन कॉलची ऑडिओ क्लिप समोर आली आहे.
काटेवाडीच्या श्रीजीत पवार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. श्रीजीत पवार हे अजित पवार यांचे चुलत पुतणे आहेत. . श्रीजीत पवार यांनी २८ जानेवारी रोजी सकाळी ८:१९ वाजता त्यांनी अजितदादांना एका विषयावर मेसेज पाठवला होता.

त्यानंतर मुंबईहून बारामतीकडे येणाऱ्या विमानाला नेटवर्क मिळताच अजित पवार यांनी स्वतःहून ८:३७ वाजता श्रीजीत यांना फोन केला. विशेष म्हणजे, ज्या विमानाचा अपघात सकाळी ८:४६ वाजता झाला, त्याच प्रवासात हा संवाद घडला होता.
या कॉलचे रेकॉर्डिंग आता सार्वजनिक झाले असून, मृत्यूच्या अवघ्या नऊ मिनिटे आधी दादांनी काय बोलले होते, हे ऐकताना उपस्थित पत्रकारांचेही डोळे पाणावले. त्या संवादातून त्यांच्या शांत, संयमी आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याच्या भूमिकेचे दर्शन घडते, असे श्रीजीत पवार यांनी सांगितले आहे.
रेकॉर्डिंगमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीतील उमेदवारीवर चर्चा होत असल्याचे ऐकू येते. अजित पवार म्हणतात की, सर्व जाती-धर्मातील लोकांना एकत्र घेऊन पुढे जाणे हेच आपले ध्येय आहे आणि प्रत्येक घटकाला न्याय मिळायला हवा.
इतर पक्षांनी माळी समाजाला जिल्हा परिषद उमेदवारी दिली नसताना आपण ती दिली आहे, असेही त्यांनी या संभाषणात स्पष्ट केले आहे. शेवटच्या श्वासापर्यंत सामाजिक समतेची भूमिका घेणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा या शब्दांतून पुन्हा अधोरेखित होत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
