बच्चू कडू यांनी करून दाखवलं, आंदोलनाला मोठं यश, उदय सामंत थेट पत्रच घेऊन आले..

अमरावती : येथे प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी अन्नत्याग उपोषणाला सुरुवात केली होती. गेल्या काही दिवसांपासून राज्यात शेतकरी कर्जमाफी वरून राजकीय वातावरण तापले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी बाबत शब्द दिला होता.

बच्चू कडू त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस होता. आज शिवसेनेचे नेते आणि महायुती सरकारचे मंत्री उदय सामंत यांनी बच्चू कडूंची भेट घेतली. त्यानंतर बच्चू कडू यांच्या आंदोलनाला मोठं यश आल्याचे पाहायला मिळाले. आज सातव्या दिवशी बच्चू कडू यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. बच्चू कडू यांना भेटण्यासाठी आलेल्या उदय सामंतांनी सरकारचे एक पत्र त्यांना दिले.
यावेळी सरकारच्या या पत्राचे उदय सामंत यांच्याकडून वाचनही करण्यात आले. कर्जमाफीसंदर्भात येत्या 15 दिवसांच्या आत समिती नेमली जाईल, त्याचा अहवाल आला की कर्जमाफी होईल, असे उदय सामंत म्हणाले तर बच्चू कडू यांनी केलेल्या मागण्या कशा मान्य केल्या जातील, याचं पत्र घेऊन आलो असल्याचे उदय सामंत यांनी म्हटले.

याबाबत बच्चू कडू यांना अनेक आमदार खासदार तसेच शेतकरी संघटनांचा पाठिंबा वाढत आहे. यामुळे सरकारवर दबाव वाढत आहे. आज त्यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रहार जनशक्ती या पक्षाचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे समाधीस्थळ गुरुकुंज आश्रम, मोझरी येथे शेतकरी, कष्टकरी, दिव्यांग, तरुण, निराधार आदींच्या न्याय्य हक्कांसाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलन पुकारले आहे.
या आंदोलनाच्या माध्यमातून ते मांडत असणारे विविध प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत. शासनाने ते प्राधान्याने सोडविलेच पाहिजेत अशी भूमिका अनेकांनी घेतली आहे. शेतकरी, मजुरांच्या, दिव्यांगांच्या हक्कासाठी मी हे आंदोलन करतो आहे. कर्जमाफीच्या मागणीत 90 टक्के मागण्या मान्य झाल्या आहेत.
दिव्यांगांचे मानधन वाढवणार आहेत, असे सांगत दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही तर दोन ऑक्टोबर मंत्रालयात घुसणार असे म्हणत बच्चू कडूंनी आपले उपोषण स्थगित केले. यामुळे आता येणाऱ्या काळात राज्य सरकारकडून दिलेल्या आश्वासनावर नेमकं काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत शेतकरी आक्रमक आहेत.