प्रवाशांनो लक्ष द्या! ‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंग नियम बदलणार, नेमका कोणता होणार फायदा?

पुणे : ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. कारण भारतीय रेल्वेने भारतीय रेल्वेने ११ नोव्हेंबर २०२५ पासून ट्रेन तिकीट बुकिंगची वेळ आणि नियमांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.

हे बदल रेल्वे प्रवाशांसाठी अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि सोयीस्कर प्रणाली आणण्यासाठी करण्यात आले आहेत. रेल्वे प्रशासनानं या नियमांबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
नव्या नियमांनुसार, आता तिकीट बुकिंगची वेळ, तत्काळ आरक्षणाची सुरुवात, आधार पडताळणी आणि बर्थ वितरणाशी संबंधित अनेक गोष्टींमध्ये बदल होणार आहेत. यामुळे प्रवाशांना तिकीट बुकिंगदरम्यान येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि फसवणूक टाळता येणार आहे.

रेल्वेच्या नव्या सूचनेनुसार, आता तिकीट फक्त प्रवासाच्या तारखेपासून 60 दिवस आधीपर्यंत बुक करता येईल, यापूर्वी ही मुदत 120 दिवसांची होती. यामुळे बुकिंग ब्लॉक करणाऱ्या एजंट्सवर आळा बसणार आहे.
याशिवाय, तिकीट बुकल्यानंतर पहिल्या १५ मिनिटांत आधार पडताळणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे फेक आयडी किंवा खोट्या बुकिंगची शक्यता कमी होणार आहे. ऑनलाइन बुकिंग सकाळी ८ वाजता सुरू होऊन रात्री ८ वाजेपर्यंत चालू राहील. या वेळापत्रकामुळे सर्व्हर लोड कमी होऊन प्रणाली अधिक स्थिर राहील, असा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे.
नव्या नियमानुसार, तत्काळ तिकीट बुकिंग स्लीपर क्लाससाठी सकाळी ११ वाजता, तर एसी क्लाससाठी सकाळी १० वाजता सुरू होईल. तसेच रात्री १० वाजेपासून सकाळी ६ वाजेपर्यंत प्रवाशांनी आपली बर्थ वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे इतर प्रवाशांना बसण्याची जागा उपलब्ध राहील.
रेल्वेने आणखी एक सकारात्मक निर्णय घेतला असून, वरिष्ठ नागरिक, ४५ वर्षांवरील महिला आणि गर्भवती महिलांना लोअर बर्थची प्राधान्याने सुविधा देण्यात येणार आहे. या बदलामुळे विशेषतः महिला प्रवासी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवास अधिक सोयीचा आणि सुरक्षित ठरणार आहे.
प्रवाशांना होणारे फायदे …
रेल्वेने स्पष्ट केलं आहे की, बुकिंग कालावधी कमी झाल्यामुळे प्रवाशांना तिकीट मिळण्याची संधी अधिक वाढेल. एजंटकडून ब्लॉक होणाऱ्या सीट्सवर आळा बसेल आणि प्रत्यक्ष प्रवाशांना आरक्षणाची अधिक संधी मिळेल.
तसेच, आधार पडताळणीमुळे प्रणाली अधिक सुरक्षित बनेल. फक्त आधार लिंक असलेल्या खात्यांमधूनच आरक्षण होऊ शकेल, ज्यामुळे बनावट आयडीवरील बुकिंग थांबतील. या बदलांमुळे रेल्वे बुकिंग प्रक्रिया अधिक पारदर्शक, न्याय्य आणि प्रवाशांच्या फायद्याची ठरणार असल्याचं रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.