राजकारणात पुन्हा भूकंपाची चाहूल; शिंदेंची नवी खेळी ठाकरे गटासाठी धोक्याची घंटा…

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीची चर्चा रंगू लागली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (ठाकरे गट) मधील खासदारांना आपल्या गटात सामील करून घेण्यासाठी मोठी रणनीती आखल्याची माहिती समोर येत आहे.

दिल्ली दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत या विषयावर चर्चा झाल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर राज्यातील राजकीय वातावरण काहीसे स्थिर झाले होते. मात्र, आता पुन्हा एकदा मोठ्या राजकीय हालचालींचे संकेत मिळत आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (ठाकरे गट) मधील काही खासदारांना आपल्या गटात आणण्याच्या हालचाली करत आहेत. त्यामुळे येत्या काळात राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठी घडामोड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अलीकडेच एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. अधिकृतपणे या बैठकीत राज्यातील विकासकामांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले असले, तरी राजकीय रणनीतीवरही सविस्तर चर्चा झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
एकनाथ शिंदे यांनी संपर्कात असलेल्या काही खासदारांची यादी पक्षश्रेष्ठींसमोर सादर केल्याचे सांगितले जात आहे. संभाव्य पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर कोणतेही कायदेशीर अडथळे येऊ नयेत यासाठी आवश्यक बाबींवरही चर्चा करण्यात आली असल्याचे समजते. तसेच, योग्य वेळ साधून ठाकरे गटाला यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे गटाला धक्का देण्याची रणनीती आखली जात असल्याचीही चर्चा आहे.