अजित पवारांच्या माळेगाव कारखान्यावर जागरण गोंधळ, शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक, नेमकं घडतंय काय?

बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखाना प्रशासनाविरुद्ध शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते विविध प्रलंबित प्रश्न पुढे करीत प्रशासनाच्या कामकाजाविरूद्ध अनेक दिवसांपासून आवाज उठवित आहेत. आज देखील याठिकाणी आंदोलन करण्यात आले. यावेळी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार आदींनी कारखाना कार्यस्थळावर येत सभासद व कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा केली होती.

याबाबत माहिती अशी की, माळेगाव कारखाना प्रशासनाने उसाच्या एफआरपीचे तुकडे केले, नीरा नदीमधील रसायन मिश्रीत पाण्याचा प्रश्न प्रलंबित राहिला, ३८०० रूपयांच्या पुढे साखरेचे दर असताना सभासदांना पहिला हप्ता २८०० रुपये इतका कमी दिला. यामुळे सभासद नाराज झाले आहेत.
याठिकाणी असलेल्या सभासदांना कोणी वाली राहिला नाही. त्यामुळेच राष्ट्रवादी काॅग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते सभासदांसाठी रस्त्यावर उतरले, अशी भूमिका आंदोलकांनी स्पष्ट केली. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज मंगळवारी शरद पवार पक्षाच्या कार्य़रर्त्यांनी शेकडोंच्या उपस्थितीत कारखाना कार्यस्थळावर जागरण गोंधळ आंदोलन केले.

यामुळे करखान्यावरील वातावरण तापले होते. यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सतिश खोमणे, एस.एन. जगताप यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी आंदोलनकर्ते गणपत देवकाते, सुशिल जगताप, ज्ञानदेव बुरुंगले, रोहन देवकाते, इंद्रसेन आटोळे, अमोल कोकरे, राजेंद्र काटे, नितीन तावरे, अनिल जगताप, धनराज निंबाळकर, गौरव जाधव आदी उपस्थित होते.
प्रशासनाकडून सभासदांना जाहीर केलेला दुसरा हप्ता ३३२ रुपये केवळ सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्यामुळे मिळाला आहे. पाच वर्षात सत्ताधारी व विरोधी संचालकामध्ये संगनमताने नुराकुस्ती खेळत राहीले. परिणामी सभासदांना एफआरपी एकरकमी मिळाली नाही, असे आंदोलकांनी सांगितले. यावेळी कारखान्याला निवेदन देण्यात आले.