बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ३०० पिंजरे खरेदी करणार ; आमदार ज्ञानेश्वर कटकेंचा मागणीवर अजित पवार यांचे निर्देश


मांडवगण फराटा : बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी उपायोजना केल्या जाणार असून सुमारे ३०० पिंजरे तातडीने खरेदी करण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले असल्याची माहिती आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी दिली आहे.

मुंबई येथे शिरूर-हवेली मतदार संघातील विविध मुद्यांबाबत आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना निवेदन सादर केल्यानंतर तातडीची बाब म्हणून विशेष बैठक घेण्यात आली, यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी सदर निर्देश दिले आहेत.

याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की,उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, खेड, आंबेगाव यासह शिरूर-हवेली या तालुक्यांमध्ये गेल्या काही महिन्यांत बिबट्याचा वावर वाढला असल्याचे निदर्शनास आले आहे. यातून शेतकऱ्यांवर हल्ल्यासारख्या दुर्घटनाही घडल्या आहेत. याकरिता तातडीने उपाययोजना म्हणून बिबटे पकडण्यासाठी ३०० पिंजरे खरेदी करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीद्वारे विशेष निधी तातडीने उपलब्ध करून दिला जाईल, त्यानुसार योजना करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा वनविभाग अधिकारी महादेव मोहिते यांना दिले असल्याची माहिती आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी दिली.पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागासह शिरूर-हवेलीमध्येही बिबट्यांकडून होणारे हल्ले वाढले आहेत.

ऊसशेती आणि लपण क्षेत्र असल्याने या भागातही बिबट्या दिसू लागले आहेत. शहरीकरणामुळे मानवी वस्ती वाढली आहे, यामध्ये बिबट्यांच्या वावरामुळे मानवी हल्ले वाढत आहेत. हे हल्ले रोखण्यासाठी ठोस उपाययोजनांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत समस्या मांडली. त्यानुसार वनविभागाने बिबटे पकडण्यासाठी ३०० पिंजऱ्यांची खरेदी करावी तसेच बिबट्या निवारा केंद्राची क्षमता तीन महिन्यांत १०० बिबट्यांची करावी. महावितरणने शेतकऱ्यांना दिवसा थ्री-फेज विद्युत पुरवठा करावा, मानवी वस्तीतील बिबट्यांचा शिरकाव होऊ नये याकरिता वनकर्मचाऱ्यांनी सतर्क रहावे आदी कामांना तातडीच्या मंजुऱ्या देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले असल्याचे कटके यांनी सांगितले.

शिरूर-हवेलीतील ज्या गाव परिसरात बिबट्यांची संख्या अधिक आहे. त्या ठिकाणी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून विशेष पथके तयार करण्याच्या सूचना वनविभागास देण्यात आल्या आहेत. तसेच, जिल्हा आपत्ती निवारण निधीतून मेंढपाळांना मोठ्या आवाजाच्या बंदुकांसह विशेष तंबू देण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी सादर करावा. त्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी दिली जाईल, असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचेही आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी सांगितले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!