बेस्ट निवडणुकीच्या पराभवानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला ; कारण काय?

पुणे : मुंबईतील बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनेलचा पराभव झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल आहे. नेमके ही भेट कशासाठी झाली याबाबत माहिती समोर आली आहे. या भेटीत राजकीय नाहीतर मुंबईतील वाहतूक कोंडी, पार्किंग समस्या आणि शहराच्या सुनियोजित विकासावर चर्चा झाल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

या भेटीबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना शहरातील पायाभूत समस्यांवर एक प्रेझेंटेशन दिले. त्यांनी मागील काही महिन्यांपासून शहरातील वाहतूक आणि पार्किंगच्या प्रश्नांवर एक आराखडा तयार केला होता. हा आराखडा कसा असेल, याबाबत मुख्यमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. टाऊन प्लॅनिंग’ हा माझ्या आवडीचा विषय आहे. तुमच्याकडे ट्रॅफिकची परिस्थिती कशी आहे हे दाखवा, मी तुम्हाला तुमच्या देशाचं भविष्य सांगतो, असं म्हणत मुंबईतील वाहतुकीची समस्या राज ठाकरे यांनी त्यांच्यासमोर मांडली.
राज्यातील शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात पुनर्विकास होत असताना अनधिकृत बांधकामे वाढत आहेत. रस्ते कमी आहेत, वाहतुकीला शिस्त नाही आणि लोक कुठेही गाड्या पार्क करत आहेत. यावर आताच काम केले नाही, तर भविष्यात मोठी अडचण होईल, अशी भीती देखील राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
