राज्यात घोटाळेबाजांचं आणि गुंडाचं राज्य, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार, सरकार अडचणीत?

पुणे:येत्या 8 डिसेंबरपासून राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन उपराजधानी नागपूर येथे होणार आहे. एकूण सात दिवसांचे हे अधिवेशन असणार आहे. त्यामुळे हे अधिवेशनही वादळी ठरण्याची शक्यता आहे. असे असतानाच आता या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी बाकावरील महाविकास आघाडीने मोठा निर्णय घेत चहापानावर बहिष्कार टाकला आहे. आम्ही चहापानाला जाणार नाही, असे विरोधकांनी म्हटले आहे.

राज्यात सध्या अनेक ज्वलंत मुद्दे आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी, वाढती गुन्हेगारी, महिला अत्याचार, रोजगार अशा मुद्द्यांमुळे राज्य सरकारला विरोधक लक्ष्य करत आहेत. सरकारवर सडकून टीका केली जात आहे. सरकार एकीकडे कात्रीत पकडले गेलेले असताना
विरोधकांनी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या चहापानावर थेट बहिष्कार टाकला आहे.

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवर आणि ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन तशी माहिती दिली. सरकारला चर्चा नको आहे. त्यांना फक्त लोकांना फसवायचं आहे. भ्रष्टाचार करण्यासाठी सरकारमध्ये चढाओढ आहे. राज्यात सध्या विरोधी पक्षनेता नाही. सरकारकडे पाशवी बहुमत आहे, त्याच जोरावर वाटेल ते करायचे असे चालू आहे, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.

राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. गुंडांचा राज्य राज्यात प्रस्थापित होताना दिसत आहे. देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार आहेत. सरकारचा मनमानी कारभार सुरू आहे लाडक्या बहिणीच्या सुरक्षेकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
तसेच पुढे वडेट्टीवार यांनी सरकारकडून कंत्राटामध्ये कसा घोळ घातला जात आहे. बेरोजगारी कशी वाढली आहे, शेतकरी कसा हवालदील आहे याची माहिती दिली आहे. दरम्यान, विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकल्यामुळे आता यावेळचे हिवाळी अधिवेशन तेवढेच वादळी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सरकारची अडचण वाढणार आहे.
