अजित पवारांच्या गटाला धक्का, आमदाराकडून पालकमंत्रिपदाचा राजीनामा, नेमकं कारण काय?

पुणे : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोडले असल्याची माहिती समोर आली आहे.

त्यांनी तब्येतीचं कारण देत गोंदीयाचे पालकमंत्रिपद सोडले आहे. तर दुसरीकडे इंद्रनील नाईक आता गोंदीयाचे नवे पालकमंत्री असणार आहे. दरम्यान, पक्षातील मतभेद याला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.
तसेच मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे. त्यामुळे त्यांना लांबचा प्रवास करण्यास अडचण येत असल्याने त्यांनी पालकमंत्री पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरळी येथे पार पडलेल्या जिल्हाध्याकक्षांच्या बैठकीत ही घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार प्रफुल पटेल यांनी काही दिवसापूर्वी नागपूर येथील पक्षाच्या शिबिरात बोलताना पालकमंत्री जिल्ह्यात येत नाही केवळ १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला येतात अशी टीका केली होती.

तर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा करत इंद्रनील नाईक गोंदियाचे नवीन पालकमंत्री असणार असल्याची माहिती दिली आहे. गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी इंद्रनील नाईक यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
ते विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोठे नेते म्हणून ओळखले जातात. तसेच तरुणाईमध्ये त्यांची मोठी प्रसिद्ध असून, ते स्वतः युवा आहेत. पालकमंत्री पदावर इंद्रनील नाईक यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती स्वतः अजित पवारांच्या वतीने देण्यात आली आहे. दरम्यान, यावेळी बोलताना बाबासाहेब पाटील यांनी राजीनामा देण्याचे कारण सांगितले.
गोंदिया खूप लांब आहे आणि डॉक्टरांनी मला थोडा प्रवास टाळायला सांगितला आहे. मी रागात राजीनामा दिला नाही. गैरसोय होत होती म्हणून राजीनामा दिला, असे बाबासाहेब पाटील म्हणाले आहेत.