राज्यात दोन ते दिवसात अवकाळी पावसाची शक्यता…!

मुंबई : महाराष्ट्रातील काही भागात कडाक्याची थंडी असतानाच काही जिल्ह्यात मात्र पावसाचे सावट आहे.अशातच आता हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवस राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
उत्तर आणि पूर्व भागातून येणाऱ्या वाऱ्यांमुळं कमी दाबाचे क्षेत्र तयार झालं आहे. त्यामुळं तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, बुधवारी- गुरुवारीदेखील विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती.
थंडीचा जोर पुन्हा वाढण्याचा इशारा
29 जानेवारीनंतर महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं 26 जानेवारी रोजी वर्तवला होता. सध्या संपूर्ण राज्यात पुन्हा थंडीचा कडाका जाणवत आहे. अशातच आता 29 जानेवारीनंतर महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 2 फेब्रुवारीपर्यंत ही थंडीची लाट कायम राहणार आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्रात थंडीच्या लाटेसारखी परिस्थिती असणार आहे. तर मुंबईत किमान तापमान सरासरीपेक्षा कमी होऊ शकते, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आलं होत. पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता देखील वर्तवली होती. तसेच किमान तापमानात किरकोळ वाढ होईल. परंतु दिवसाच्या तापमानात अंशत: घट होण्याची शक्यता आहे. अशातच आता पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बदलत्या हवामानाचा रब्बी पिकांना फटका
राज्यात सातत्यानं तापमानात चढ उतार होत आहे. कधी थंडी तर कधी पाऊस पडत आहे. या हवामानाचा रब्बी हंगामाच्या पिकांवर परिणाम होत आहे. बहुतांश भागात कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तसेच गहू, हरभरा, मका या पिकांना देखील या वातावरणाचा फटका बसणार असून उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खरीप हंगामात आधीच अतिवृष्टी आणि परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या सगळ्या आशा आता रब्बी हंगामातील पिकांवर आहेत. मात्र, हवामानातील बदलाचा रब्बी पिकांवर परिणाम होत असल्यानं शेतकरी चिंतेत आहेत.