राहुल नार्वेकर यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, ‘या’ बड्या नेत्याने केली मागणी…

मुंबई : महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. राज्यातील 29 महापालिकेच्या निवडणुकीचे मतदान 15 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. राजकीय सभांचा धडाका सुरू आहे. महापालिकांवर एकहाती सत्ता मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी केली जात आहे.

कुठे युती महाआघाडी म्हणून निवडणुका लढवल्या जात आहेत तर कुठे स्वतंत्रपणे. संपूर्ण समीकरणेच या निवडणुकीत बदलली दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करत थेट गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, कार्यकर्त्यांवर दमदाटी करणे, निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करणे आणि संविधानिक पदाचा गैरवापर करणे या प्रकरणांमध्ये राहुल नार्वेकर दोषी आहेत. अशा व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. निवडणूक आयोग कोणतीही कारवाई करत नसल्यामुळे आयोग सैराटपणे वागत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

विधानसभा अध्यक्षांना दिलेले विशेष अधिकार संविधानाच्या चौकटीत वापरले जाणे अपेक्षित असते. मात्र राहुल नार्वेकर यांनी या अधिकारांचे हनन केल्याचा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. आर्थिक भ्रष्टाचार, संविधानिक स्वरूपातील भ्रष्टाचार आणि प्रशासकीय व्यवस्थेमध्ये दबाव टाकण्याचा प्रकार अशा तीन स्तरांवर नार्वेकर दोषी असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे राष्ट्रपतींनी तात्काळ हस्तक्षेप करून त्यांची बडतर्फी करावी, अशी स्पष्ट मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.