सणासुदीच्या आधीच दे धक्का! राज्य सरकारने आनंदाचा शिधा व शिवभोजन थाळी संदर्भात घेतला मोठा निर्णय….

पुणे : राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती डगमगलेली असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. महाविकास आघाडी आणि एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातील योजनांवर गडांतर येत असल्याचे म्हटले जात आहे. अशातच आता ऐन सणासुदीच्या काळात आता गरिबांवर मोठं संकट आले आहे.

राज्यातील आर्थिक अडचणी आता थेट सामान्य नागरिकांच्या थाळीत पोहोचल्या आहेत. दिवाळी, दसऱ्यासारख्या सणासुदीच्या काळात सरकारकडून गरीबांना दिला जाणारा ‘आनंदाचा शिधा’ यंदा रद्द करण्यात आला आहे.
शिवाय दररोज लाखो गरीबांना मिळणाऱ्या ‘शिवभोजन थाळी’ योजनेवरही काटकसर करण्याची वेळ आली आहे. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत स्पष्टवक्तेपणाने माहिती दिली आहे.

दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून ‘आनंदाचा शिधा’ योजना सणांच्या पार्श्वभूमीवर गरजू कुटुंबांना दिलासा देणारी ठरत होती. मात्र यंदा सरकारकडून तिजोरीवरील ताणाचा हवाला देत ही योजना थांबवण्यात आली आहे. त्यामुळे अनेक गरीब कुटुंबांची सणासुदीची तयारी धोक्यात आली आहे.
अन्न मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं की, शिवभोजन योजनेसाठी सध्या किमान ₹६० कोटींची गरज आहे. मात्र शासनाने फक्त ₹२० कोटींचीच तरतूद केली आहे. त्यामुळे राज्यभरात चालणाऱ्या अनेक शिवभोजन केंद्रांना बंद करावे लागणार असून, उर्वरित केंद्रांवर थाळ्यांची संख्या देखील कमी केली जाणार आहे.
योजना सुरू ठेवताना होत असलेल्या गैरव्यवहारावरही भुजबळ यांनी प्रकाश टाकला. “एका केंद्रात सिमेंटची पोती ठेवून थाळी वाटप केलं जात होतं, असं सांगून अशा केंद्रांवर कारवाई करून बंद केलं जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. सध्याच्या परिस्थितीत नवीन केंद्रांना मंजुरी देणंही शक्य नसल्याचं भुजबळ यांनी नमूद केलं आहे.