मुलींनी अभिजीत दिपकेंना सांगितलं प्रेग्नन्सी टेस्टचं धक्कादायक सत्य; थेट मोठा निर्णय, आजपासून आंदोलनाची सुरुवात?

मुंबई : मे महिन्याच्या अखेरीस अभिजीत दिपके अमेरिकेतून भारतात परतले. त्यानंतर त्यांनी नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर देशभरात आंदोलनाची हाक दिली. दिल्लीतील जंतर-मंतरवर या आंदोलनाला सुरुवात झाली. या आंदोलनाला देशभरातून प्रतिसाद मिळाल्याचा दावा करण्यात आला. विविध शहरांमध्ये विद्यार्थी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत रस्त्यावर उतरले.
यानंतर विविध विद्यार्थी प्रश्नांवरील आंदोलनांमध्ये ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) सक्रिय झाल्याचे पाहायला मिळाले. सरकारी शाळांमधील नादुरुस्ती, अपुऱ्या सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांचा मुद्दा पक्षाने हाती घेतला आहे. आपण सध्या थेट राजकारणात प्रवेश करणार नसून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी लढणार असल्याचे अभिजीत दिपके यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते. मात्र, त्याचदरम्यान कॉकरोच जनता पार्टीत अंतर्गत फूट पडल्याचीही चर्चा झाली.

आता अभिजीत दिपके यांनी आपला मोर्चा आदिवासी आश्रमशाळांकडे वळवला आहे. त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध अडचणी मांडल्याचे सांगण्यात आले. काही आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना पुरेशा सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारीही समोर आल्याचा दावा करण्यात आला.


यावेळी विद्यार्थ्यांनी आश्रमशाळांमधील कथित गैरप्रकार आणि असुविधांबाबतही माहिती दिली. काही विद्यार्थिनींच्या गर्भधारणेच्या चाचण्या करण्यात आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. मराठवाडा आणि विदर्भातील विद्यार्थी अभिजीत दिपके यांच्याशी चर्चा करण्यासाठी उपस्थित होते.
मुख्य आरोपींना वाचवण्यासाठी आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना आरोपी केले जात असल्याचा आरोपही काही विद्यार्थ्यांनी केला. तसेच सरकारी आदिवासी विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केली. यावेळी भंडारा जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेचा मुद्दा विद्यार्थ्यांनी वारंवार उपस्थित केला.
भंडारा जिल्ह्यातील एका आदिवासी आश्रमशाळेत एकाच खोलीत तब्बल 15 विद्यार्थ्यांना ठेवले जात असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे आता अभिजीत दिपके या आश्रमशाळांच्या प्रश्नावर आंदोलन उभारण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून अभिजीत दिपके सातत्याने विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधत आहेत. त्यांनी जिल्हा परिषद शाळांची पाहणी करून तेथील परिस्थिती जाणून घेतली होती. आता त्यांनी आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या समस्या हाती घेतल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात भंडारा आणि आदिवासी आश्रमशाळांच्या प्रश्नावर त्यांची भूमिका काय असणार, याकडे लक्ष लागले आहे.