“30 जूनपूर्वी कर्जमाफी फिक्स!” मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा; बँकांना कडक आदेश, शेतकऱ्यांमध्ये दिलासा

मुंबई : राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी 30 जून 2026 पूर्वी पूर्ण केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून, या घोषणेनंतर शेतकरी वर्गात मोठा आशेचा किरण निर्माण झाला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसंदर्भात बँकर्ससोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत शेतकऱ्यांना वेळेत आणि सुलभपणे कर्ज मिळावे यावर सविस्तर चर्चा झाली. त्यांनी सर्व राष्ट्रीयकृत बँकांना कृषी कर्जवाटपाचे 80 टक्के लक्ष्य तातडीने पूर्ण करण्याचे कठोर निर्देश दिले.
फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले की, “शेतकऱ्यांकडून कर्ज देताना CIBIL स्कोअरची अट लावू नये. कोणत्याही शेतकऱ्याला कर्जापासून वंचित ठेवू नये.” कर्जमाफीची प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी यासाठी सरकारने विशेष नियोजन केल्याचेही त्यांनी सांगितले.

बैठकीत समोर आलेल्या आकडेवारीनुसार जिल्हा सहकारी व ग्रामीण बँका मिळून सुमारे 67 टक्के कर्जवाटप करत आहेत, तर राष्ट्रीयकृत बँकांचा वाटा 26 टक्के आहे. मात्र काही बँकांचे लक्ष्य अपूर्ण असल्याने त्यांच्यावर नाराजी व्यक्त करण्यात आली.

हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर यंदा एल निनोचा धोका असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. पावसाचा अंदाज सुमारे 88 टक्के असून, शेती उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार योजना अधिक गतीने राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी सरकारने “महाविस्तार अॅप” सुरू केले असून, यात एआयच्या मदतीने पीक सल्ला, हवामान अपडेट्स आणि शेती मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. शेतकरी थेट प्रश्न विचारून माहिती मिळवू शकतील.
तसेच खत पुरवठ्यावर कडक नियंत्रण ठेवण्यात येणार असून, औद्योगिक वापरासाठी खतांचा गैरवापर रोखण्यासाठी विशेष तपासणी आणि व्हिडिओग्राफी केली जाणार आहे.
30 जूनपूर्वी कर्जमाफी पूर्ण होणार असल्याच्या घोषणेमुळे राज्यातील शेतकरी वर्गात मोठा दिलासा निर्माण झाला असून, या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.