सुनेत्रा पवार यांनी पूर्ण केली ‘स्व-गणना’; राष्ट्रीय जनगणना मोहिमेने कल्याणकारी योजनेची सुनिश्चिती….

पुणे: राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी जनगणना २०२७’ मध्ये सक्रीय सहभाग नोंदवून आपली स्व-गणना पूर्ण केली आहे. ‘जनगणना २०२७’ ही केवळ नोंदणी नसून शाळा, रुग्णालय तसेच कल्याणकारी योजनांची सुनिश्चिती करते, यामध्ये राज्यातील प्रत्येक व्यक्ती, कुटुंबाला विविध पायाभूत सुविधांचा लाभ मिळावा, याकरीता नागरिकांनी या राष्ट्रीय मोहिमेत सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले आहे.

सुनेत्रा पवार म्हणाल्या, जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला महाराष्ट्र राज्यात १ मे पासून सुरुवात झाली असून ‘स्व-गणना’ प्रक्रिया १५ मे २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. याकरिता केंद्र शासनाने https://se.census.gov.in/संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले असून नागरिकांनी या संकेतस्थळाचा वापर करुन आपल्या सोयीनुसार अद्ययावत माहिती भरावी.
स्व-गणनेच्या टप्प्यानंतर १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत प्रगणक गृहभेटी देणार असून जाऊन प्रत्यक्ष माहिती संकलित करणार असून यावेळी प्रगणकास संपूर्ण सहकार्य करावे.

आपण दिलेली माहिती अत्यंत गोपनीय असण्यासोबत ती कायद्याने सुरक्षित असणार आहे. या माहितीचा वापर राज्याच्या विकास आणि नियोजनासाठी केला जाणार आहे, त्यामुळे या राष्ट्रीय मोहिमेत राज्यातील नागरिकांनी एकजुटीने सहभागी होऊन स्व-गणना करावी, असे आवाहनही श्रीमती पवार यांनी केले.

यावेळी उपायुक्त तथा शहर जन गणना अधिकारी विजय लांडगे, सहायक आयुक्त तथा चार्ज अधिकारी बाळासाहेब ढवळे आदी उपस्थित होते.