बागेश्वर बाबांच्या विधानावरून खळबळ; शिवाजी महाराजांबाबतच्या दाव्यावर फडणवीसांची स्पष्ट भूमिका…

नागपूर: नागपूरमधील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट परिसरात डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि अनुसंधान संस्थेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या ‘भारतदुर्गा’ मंदिराचा शिलान्यास सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते पार पडला.

या कार्यक्रमानंतर आयोजित धर्मसभेत बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे चर्चेला उधाण आले आहे.
सभेत बोलताना त्यांनी शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्यातील एका कथित प्रसंगाचा उल्लेख केला. त्यांच्या या विधानावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर भूमिका स्पष्ट केली आहे.

फडणवीस म्हणाले की, अशा प्रकारच्या घटनेचा ठोस ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही. महापुरुषांभोवती अनेक लोककथा तयार होत असतात आणि त्या काळानुसार बदलत जातात. उपलब्ध इतिहासग्रंथांमध्ये या संदर्भातील उल्लेख आढळत नसल्याचे त्यांनी नमूद केले.
