अजित पवारांच्या विमान अपघातावर सुप्रिया सुळेंनी मौन सोडलं ; केली मोठी मागणी..

पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील विमान अपघातानंतर अनेक प्रश्न आणि शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद गटाच्या नेत्या आणि त्यांची बहीण सुप्रिया सुळे यांनी मौन सोडत या विषयावर पहिल्यांदा स्पष्टपणे भाष्य करत मोठी मागणी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी X वर एक पोस्ट केली आहे. “आदरणीय अजितदादा यांच्या अपघाती मृत्यूनंतर संबंध महाराष्ट्राला धक्का बसलेला आहे. समाजमाध्यमांतून अनेक शंका-कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. जनभावना अतिशय तीव्र असून लोक अजूनही शोकाकूल अवस्थेत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार हे अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने काही मुद्दे, तथ्ये, शंका उपस्थित करीत आहेत. त्यांची उत्तरे जनतेला मिळालीच पाहिजेत. ही उत्तरे मिळण्यासाठी यंत्रणेकडून उशीर लागत असेल तर अस्वस्थता आणखी वाढेल. ती वाढू नये यासाठी या घटनेतील सत्य लोकांसमोर पारदर्शक पद्धतीने पुढे येणे अतिशय गरजेचे आहे असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
या सर्व पार्श्वभूमीवरच आता आमदार रोहित पवार यांना सुरक्षा मिळण अतिशय गरजेचे आहे. त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारने घेतली पाहिजे अशी मोठी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

अजित पवारांच्या विमान अपघातावर काल झालेल्या पत्रकार परिषदेतही आमदार रोहित पवार यांनीही, आपल्या कुटुंबीयांना आपल्या सुरक्षितेची काळजी वाटत असल्याचं म्हटलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांचं हे ट्विट, ही मागणी महत्वाची ठरताना दिसत आहे.