मोठी बातमी! अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणात मोठी अपडेट, राज्य सरकारने दिले महत्त्वाचे आदेश…

बारामती : राज्यातील राजकीय वर्तुळाला हादरवून टाकणाऱ्या घटनेत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. बारामती विमानतळाजवळ झालेल्या या भीषण दुर्घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून, या घटनेभोवती अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

तसेच काहींनी हा अपघात असल्याचं म्हटलं असलं, तरी काही राजकीय नेते आणि नागरिकांकडून घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या भीषण विमान दुर्घटनेच्या तपासासाठी राज्य सरकारने आता सीआयडी चौकशीचे आदेश दिले असून, तपासाचा रोख तांत्रिक बिघाड आणि ‘त्या’ शेवटच्या २५ मिनिटांकडे वळला आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून विमान अपघात तपास ब्युरो मार्फत चौकशी सुरू करण्यात आली असून, आता राज्य सरकारनेही मोठा निर्णय घेतला आहे. लोकांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी या प्रकरणाचा तपास थेट राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला आहे. त्यामुळे या दुर्घटनेची चौकशी आता दोन स्तरांवर होणार असल्याने सत्य लवकरच समोर येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, विमान अपघात तपास ब्युरोच्या तीन सदस्यीय पथकाने घटनास्थळी भेट देऊन प्राथमिक तपास सुरू केला असून, विमानाचा ब्लॅकबॉक्स ताब्यात घेण्यात आला आहे. या ब्लॅकबॉक्समधून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे अपघाताच्या काही क्षणांपूर्वी नेमकं काय घडलं, विमानाची तांत्रिक स्थिती काय होती, तसेच पायलट आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल यांच्यातील संवाद कसा होता, याचा तपशील समोर येणार आहे.
