महाराष्ट्राच्या ‘दादा ‘ला आज अखेरचा निरोप; काटेवाडीत अजित पवारांना शासकीय मानवंदना,किती वाजता अंत्यसंस्कार?

काटेवाडी : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्दज नेते अजित पवार यांचे (28 जानेवारी )काल विमान अपघातात दुर्देवी निधन झाले. त्यांच्या निधनाने अख्खा महाराष्ट्र सुन्न झाला आहे. आज बारामतीत त्यांच्या पार्थिवावर अकरा वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या जन्म गावी काटेवाडी येथे शासकीय इतमामात त्यांना मानवंदना देण्यात येणार आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पार्थिव काल रात्री त्यांच्या सहयोग निवासस्थानी होते. जिथून ते पहाटेच त्यांच्या काटेवाडी या मूळ गावी नेण्यात आले.आज सकाळी ११ वाजता बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी संपूर्ण बारामतीत जनसागर लोटला आहे.
या अंत्यविधीसाठी संपूर्ण पवार कुटुंबीय दाखल झाले आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्र आणि राज्यातील अनेक मोठे नेते बारामतीत दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर व्हीआयपींच्या सुरक्षेसाठी बारामती विमानतळावर पोलिसांसह NDRF चे पथक तैनात करण्यात आले आहे.

आपल्या लाडक्या दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी सुमारे २ ते ३ लाख लोक या सोहळ्यात सहभागी होण्याची शक्यता आहे. यामुळे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळत आहे. सध्या पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली असून वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.सध्या बारामती ही शोकसागरात बुडाली असून शहरात ठिकठिकाणी श्रद्धांजलीचे बॅनर लावण्यात आले आहेत.