‘राष्ट्रवादी’चा अखेरच्या क्षणी टाकला तगडा डाव! जितेंद्र बडेकर यांना उरुळीकांचन – सोरतापवाडी गटात उमेदवारी जाहीर….

उरुळी कांचन : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीने अत्यंत प्रतिष्ठेच्या झालेल्या उरुळीकांचन – सोरतापवाडी जिल्हा गटात राष्ट्रवादीकडून अखेरच्या क्षणी जितेंद्र बाळासाहेब बडेकर यांनी उमेदवारी खेचून आणली आहे. उरुळीकांचन स्थानिक पक्षाच्या गटाची साथ , उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी सर्वाधिक प्रबळ उमेदवार म्हणून त्यांची केलेली निवड या सर्व बलस्थानांनी त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

पूर्व हवेली तालुक्याच्या राजकीय पटलावर संवेदनशील मतदारसंघ म्हणून उरुळीकांचन- सोरतापवाडी जिल्हा परिषद गटाची ओळख आहे. अणुसूचित – जातीसाठी हा मतदारसंघ हा राखीव असला तरी उरुळीकांचन ग्रामपंचायतीच्या स्थानिक व पक्षीय राजकारणामुळे या जिल्हा परिषद गटात उमेदवारीचा विषय अतिशय संवेदनशील झाला होता. मागणी दोन महिने या गटात जिल्हा परिषदेची राष्ट्रवादी ची उमेदवारी कोणाला देणार, म्हणून प्रचंड संघर्ष पहायला मिळत होता.
आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या दृष्टीने हा विषय हाताळण्याची कसोटी त्यांच्यावर येऊन ठेपली होती. या सर्व उमेदवार निवड प्रक्रियेचा विषय राष्ट्रवादी शेवटपर्यंत गोपनीय पध्दतीने हाताळला होता. अखेर पक्षाचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी जितेंद्र बडेकर यांच्यावर आपला विश्वास व्यक्त करुन त्यांना पक्षाची उमेदवारी जाहीर केली आहे.

जितेंद्र बडेकर हे अत्यंत वादळी नेतृत्व म्हणून पक्षात परिचित असून दांडगा लोकसंपर्क तसेच जनतेच्या कामांची सोडवणूक करण्याची हातोडी तालुक्यात परिचित आहे. स्वच्छ चेहरा व विकासभिमुख काम या त्यांच्या कामाच्या पध्दतीने त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर दिली होती. विधानसभेच्या निवडणुकीत आमदार ज्ञानेश्वर कटके यांना दिलेली मोलाची साथ या कारणांनी त्यांचा उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रवादीने अंतर्गत गटबाजीतून मार्ग काढीत तगडा उमेदवाराचा पत्ता काढल्याने या गटात काय होणार म्हणून चर्चा रंगली आहे