राज्यात 262 नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या मतदानाला सुरूवात, नेत्यांची प्रतिष्ठापणाला, कोण कोणाला धुळ चाळणार?

पुणे : राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार, आज राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरू झाली. राज्यातील 262 नगरपरिषद आणि नगरपंचायतीत मतदान प्रक्रिया पार पडत आहे. एकूण 12,316 मतदान केंद्रासाठी 62,108 निवडणूक अधिकाऱ्यांसह कर्मचारी सज्ज झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील 12 नगरपरिषद आणि 3 नगरपंचायतींसाठी मतदान सुरू आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सुमारे 6.3 लाख नोंदणीकृत मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सज्ज झाले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील या निवडणुकीत एकूण 6,70% सदस्य आणि 264 अध्यक्षांचे भवितव्य ठरणार आहे. नाशिक जिल्ह्यातील 11 नगरपरिषदांसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यातील 416 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू झाली. नगराध्यक्ष व सदस्य पदांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होईल. नगराध्यक्षपदासाठी तब्बल 56 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदान प्रक्रियेसाठी अडीच हजार शासकीय कर्मचारी सेवेत आहेत.संवेदनशील बूथवर अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात आहे. भगूर, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, येवला, पिंपळगाव, ओझर, इगतपुरी येथे महायुती आमने–सामने आहेत. आज छत्रपती संभाजीनगरमधील 6 नगरपरिषदेसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे. आज सिल्लोड, पैठण, गंगापूर, वैजापूर, खुलताबाद, कन्नड या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया सुरू झाली.
अहिल्यानगर जिल्ह्यातील नगरपरिषदेच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. अहिल्यानगर जिल्ह्यात 12 पैकी आठ नगरपरिषदेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार तर जिल्ह्यातील चार ठिकाणी नगरपरिषदेला स्थगिती देण्यात आली. बदलापूर नगरपरिषदेच्या 43 जागांसाठी मतदानाला सुरूवात. 6 जागांची निवडणूक पुढे ढकलण्यात आली. नगराध्यक्षपदासाठी भाजप आणि शिंदे शिवसेनेमध्ये लढत आहे.

धाराशिव जिल्ह्यामध्ये आज आठ नगरपालिकेसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. आठ नगराध्यक्ष आणि 183 सदस्याचे भवितव्य आज मत पेटीमध्ये बंद होणार आहे. जिल्ह्यातील आठ नगरपालिकेच्या 93 प्रभागासाठी 287 मतदान केंद्रावर ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

धाराशिव आणि उमरगा येथील प्रत्येकी तीन जागेवर मतदान प्रक्रियेला स्थगिती असून 20 डिसेंबर रोजी ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्ह्यात दोन लाख 43 हजार मतदार आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यातील भूम, परंडा कळंब, धाराशिव, तुळजापूर नळदुर्ग, मुरूम आणि उमरगा या आठ नगरपालिकेसाठी आज मतदान होत आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये नगरपालिका निवडणुकीसाठी आमदार तानाजी सावंत, आमदार राणा जगजीत सिंह पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, माजी मंत्री बसवराज पाटील या महत्त्वाच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे
