महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी १५ पासून शक्य ?

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल नेमका लागणार तरी कधी? गेल्या काही दिवसांपासून हाच प्रश्न राज्यात सर्वाधिक उत्सुकतेचा बनला आहे. १६ मार्च रोजी सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर घटनापीठाने आपला निकाल राखून ठेवला आहे. तेव्हापासून सर्वांचे लक्ष निकालाकडे आहे. दरम्यान, घटनापीठातील एक न्यायमूर्ती न्या. एम. आर. शाह १५ मे रोजी निवृत्त होत आहेत, त्यामुळे १५ मे पूर्वी या सत्तासंघर्षाचा निकाल लागू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
एखाद्या मोठ्या प्रकरणाची सुनावणी घटनापीठाने पूर्ण केल्यानंतर निकालाला किमान एक महिना लागतो. पण जास्तीत जास्त किती कालावधी लागेल, याची काही शाश्वती नसते. पण महाराष्ट्राच्या केसमध्ये एक न्यायमूर्ती निवृत्त होत असल्याने किमान त्याआधी निकाल लागेल, अशी शक्यता आहे. सुप्रीम कोर्टात एखाद्या प्रकरणाचा निकाल येणार हे आदल्या दिवशीच कळते. कोर्टाच्या कामकाजाच्या यादीत एक दिवस आधी निकालाची ही तारीख येते. त्यामुळे महाराष्ट्राच्या केसचा निकाल जेव्हा लागेल, त्याच्या एक दिवस आधीच त्याची तारीख जाहीर होईल. मात्र, त्या तारखेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
ज्या घटनापीठासमोर ही सुनावणी झाली, त्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठातले एक न्यायमूर्ती पुढच्या महिन्यात निवृत्त होत आहेत. न्या. एम. आर. शाह १५ मे रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे १४ मेच्या आधी कधीही हा निकाल येणार हे तर निश्चित मानले जात आहे. त्यातच २० मे पासून सुप्रीम कोर्टाच्या उन्हाळी सुट्याही सुरु होत आहेत. २० मे ते २ जुलै अशी सुप्रीम कोर्टाची सुटी असणार आहे. त्यामुळे एप्रिल शेवटचा आठवडा किंवा मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कधीही निकालाची शक्यता आहे, असे कायदेशीर वर्तुळात बोलले जात आहे.