मोठी बातमी!:’त्या ‘मुद्द्यावरून महापालिका निवडणुका रखडल्या जाणार ; थेट एप्रिलमध्ये निवडणुका?

पुणे: आगामी होणाऱ्या महापालिका निवडणुका राज्य निवडणूक आयोगाकडून जानेवारी अखेरीपर्यंत घेण्याचा पुरेपूर प्रयत्न सुरू असला तरी ‘ईव्हीएम’च्या उपलब्धतेवरच हा मुहूर्त साधणे शक्य होणार आहे. महापालिकांसाठी वेळेत ‘ईव्हीएम’ उपलब्ध न झाल्यास महापालिकांच्या निवडणुका या दहावी-बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर मार्च-एप्रिलमध्ये होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ऑक्टोबर अखेरीपर्यंत घेणे आवश्यक होते. मात्र, प्रत्यक्ष निवडणुका घेण्यासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेता या निवडणुकांचा कालावधी वाढवून घेण्यात आला आहे. महापालिकांच्या आरक्षणाची सोडत येत्या १५ दिवसांत काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याशिवाय मतदारयादी अंतिम झाल्यानंतर त्यानुसार बूथनिहाय याद्या फोडण्याचा कार्यक्रमही या आठवड्यात सुरू होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपरिषद आणि महापालिकांच्या निवडणुका घेण्यासाठी आवश्यक असणारी प्रभाग रचना, गट, गण हे अंतिम केले आहेत. निवडणुकीसाठीची कार्यवाही पूर्ण करण्यात येत असली, तरी प्रत्यक्ष मतदान घेण्यासाठी लागणाऱ्या ‘ईव्हीएम’चा तुटवडा हा कळीचा मुद्दा बनला आहे.त्यामुळे निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

