अंतरवालीतून जरांगेंचा सरकारला थेट इशारा, म्हणाले, दंगल करायला नाही, हक्कासाठी मुंबईत येतोय…

मुंबई : मराठा आरक्षणाच्या हक्कासाठी आता थांबायचं नसून शांततेत मुंबईच्या दिशेने जायचं असल्याचे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले. सरकारकडून जाणीवपूर्वक आपल्या अडवणूक असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला. कोणत्याही परिस्थितीत मुंबई गाठायची असल्याचे जरांगे यांनी म्हटले.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर निर्णायक आंदोलनाची घोषणा केल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच करण्याआधी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मराठा समाज बांधवांना संबोधित केले. जरांगे पाटील यांनी मराठा समाज बांधवांना आवाहन करताना म्हटले की, कोणीही कितीही डिवचलं तरी शांत राहायचं, कोणीही दगडफेक, हिंसाचार करायचे नसल्याचे त्यांनी म्हटले.
मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, खोट्या हिंदूंकडून खऱ्या हिंदूंना त्रास दिलाय जातोय. आम्ही हक्क मागण्यासाठी मुंबईत जात आहोत, कोणताही धिंगाणा, दंगल करायला जात नाही. तरीही आमची अडवणूक कशाला करताय असा प्रश्न जरांगे यांनी केला.

तुम्ही हिंदूविरोधी काम का करताय, हिंदुत्वाशी ज्यांचं देणंघेणं नाही, त्यांच्याकडून अडवणूक सुरू असल्याचा आरोप जरांगे यांनी सरकारवर केला. सणावाराच्या दिवशी हिंदूंना त्रास देण्यासाठीच पंतप्रधान मोदी आणि शाह यांनी मुख्यमंत्रीपदी फडणवीसांना बसवले का, असा सवाल जरांगे यांनी केला आहे.

सणासुदीच्या दिवसात सरकारलाच वातावरण खराब करायचं आहे. मोर्चाबाबत आणि आपल्या मागण्यांबाबत सरकारला सांगून चार महिने झाले आहेत. तरीही कोणतीही हालचाल नाही. हे सरकार इंग्रजांपेक्षा वाईट आहे इंग्रजांनी अडवणूक केली नाही तेवढी अडवणूक सरकारकडून सुरू असल्याचा आरोप जरांगे यांनी केले.