पुणे महापालिकेचा नागरिकांना दणका ; मीटर बसवण्यास विरोध केल्यास गुन्हा दाखल….

पुणे : पुणे महानगरपालिकेच्यावतीने शहरात समान पाणीपुरवठा योजना राबवली जात आहे.या योजनेअंतर्गत बसवण्यात येणाऱ्या मीटरसाठी काही नागरिकांकडून विरोध होत आहे. त्यामुळे महापालिकेने आता मोठा निर्णय घेतला आहे. हे मीटर बसविण्यास विरोध केल्यास शासकीय कामात अडथळा आणल्याचा (कलम ३५३) गुन्हा दाखल केला जाईल, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे विरोध करणाऱ्या नागरिकांना मोठा दणका बसणार आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुणे महापालिकेत बैठक घेतली होती. यात पाण्याची गळती रोखण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे आदेश त्यांनी पालिकेला दिले होते. त्यानुसार महापालिकेने समान पाणीपुरवठा योजनेतील पाण्याचे मीटर बसविण्याचे काम महिन्याभरात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र याला नागरिकाकडून होणारा विरोध लक्षात घेता पुणे महापालिका आता ॲक्शन मोडवर आली आहे. मीटर बसवण्यास विरोध करणाऱ्या नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
महापालिकेतर्फे समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहरात ८३ पाण्याच्या टाक्या उभारण्यात येत आहेत; तसेच एक हजार किलोमीटरहून अधिक जलवाहिन्या टाकण्यात येत आहेत. पाण्याच्या ६५हून अधिक टाक्यांचे काम झाले आहे. मात्र, काही जलवाहिन्यांचे काम अडचणींमुळे बाकी आहे. मात्र हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे मीटर बसवण्यास नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.