ज्ञानोबा माऊलींच्या पालखी सोहळ्यात पालखीरथ ओढण्याचा मान कोणाकडे? आळंदीत बैलजोड्याही सजल्या, जाणून घ्या..

पुणे : संपूर्ण राज्यासाठी आनंदाचा भक्तीचा सोहळा असलेला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी बैलजोडीचा मान यंदा घुंडरे घराण्याला मिळाला आहे. आज माऊलीच्या मुख्य संजीवन समाधी मंदिरात या बैलजोडीचे पूजन केल्यानंतर आळंदी नगरीतून या बैलजोडीची मिरवणूक काढण्यात आली आहे. यावेळी अनेक वारकरी उपस्थित होते.
यावर्षी घुंडरे कुटुंबातील विवेक ज्ञानेश्वर घुंडरे, जनार्दन घुंडरे, अर्जुनराव मारुती घुंडरे आणि सचिन बाळासाहेब घुंडरे हे पालखी रथ ओढणाऱ्या बैलजोडीचे मानकरी ठरले आहेत. आज संपूर्ण आळंदी नगरीत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. विवेक घुंडरे यांनी सातारा जिल्ह्यातील बावधन या गावातून येथून राजा-प्रधान ही बैलजोडी सहा लाख रुपयांना खरेदी केली आहे.
तसेच दुसरी बैलजोडी सावकार व संग्राम ही हिंजवडी येथून उमेश साखरे यांच्याकडून पाच लाख रुपयांना खरेदी केली आहे. ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ सोहळ्यासाठी बैलांकडून शेती मशागत, बैलगाडी ओढणे असा सराव केला जात आहे. या बैलांसाठी खुराक म्हणून शाळूची वैरण, हिरवा चारा, पेंड, खारीक-खोबर्याचा भुगा, बैलखाद्य मिक्स आदी देत आहेत.
त्यांनी वेगवेगळ्या भागांतून उत्कृष्ट अशा बैलजोड्या खरेदी केल्या असून त्यांचे सराव आणि पोषण याकडेही विशेष लक्ष दिले जात आहे. पालखी सोहळा यंदा गुरुवार, 19 जून 2025 रोजीआळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. संस्थान कमिटीने जाहीर केलेल्या यंदाच्या सोहळ्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर
केले आहे.
दरम्यान, हा पालखी सोहळा सुमारे 256 किलोमीटरचा पायी प्रवास करत आषाढ शुद्ध दशमी, शनिवार 5 जुलै रोजी पंढरपूरात दाखल होईल. यावेळी पावसाचा अंदाज जास्त असल्याने वारकऱ्यांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. यासाठी प्रशासन आतापासूनच कामाला लागले आहे.