कानिफनाथ यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी, ग्रामपंचायतीने केला ठराव, वंचित आक्रमक झाल्याने वाद पेटला…

अहिल्यानगर : पाथर्डी तालुक्यातील कानिफनाथ यात्रेबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. याठिकाणी मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घालण्याचा ठराव मढी ग्रामपंचायतीकडून करण्यात आला आहे. या ठराव लवकर जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार आहे, असे मढी ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले आहे.

यामुळे येणाऱ्या काळात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. याबाबत आता वंचित बहुजन आघाडीने या ठरावाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. यामुळे हा वाद मिटणार की पेटणार हे येणाऱ्या काळात समजेल. हा ठराव असंविधानिक असून, याबाबत जिल्हा प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्याची तयारी दाखवली आहे.
कानिफनाथ यात्रेला मोठी परंपरा आहे. महिनाभरापूर्वी देवाला तेल लावले जाते. या काळात ग्रामस्थ तेलातील तळलेले पदार्थ खात नाही. पलंग, गादी वापरत नाहीत. याच परंपरा यात्रेत सहभागी होणाऱ्या इतर भाविकांना देखील लागू होतात. पण, त्याचे पालन केले जात नसल्याने ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त केली आहे.

याबाबत मढी ग्रामपंचायतीचे सरपंच व कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय मरकड म्हणाले, एक महिन्यावर कानिफनाथांची यात्रा आली आहे. या यात्रेत बहुसंख्य व्यापारी मुस्लिम येत असतात आणि ते परंपरा पाळत नाहीत. या काळात महिनाभर देवाला तेल लावले जाते. हा काळ दुखवट्याचा असतो, असेही त्यांनी सांगितले.

तसेच जत्रेच्या या काळात आम्ही कोणतेही शुभकार्य करत नाही, शेतीची कामं करत नाही. गादी आणि पलंग देखील वापरत नाही. असे मरकड यांनी सांगितले. मात्र याचे पालन अनेकजण करत नाहीत. ही आमची परंपरा असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या यात्रेतील मुस्लिम व्यापारी आमच्या परंपरा पाळत नाहीत.
यातून भाविकांच्या भावना दुखावल्या जातात. यामुळे मढी ग्रामपंचायतीने मुस्लिमांना बंदी घालण्याचा ठराव घेतला आहे. होळीपासून या यात्रेला सुरवात होते. ही यात्रा गुढीपाडव्यापर्यंत सुरू असते. मात्र आतापासूनच वादाला सुरुवात झाली आहे.