राज्यात रोज ८ शेतकऱ्यांची आत्महत्या!! सरकारने दिलेल्या माहितीने उडाली खळबळ, २०१० साली होते तेवढेच आज बाजारभाव, पण खर्च १० पट वाढला…

मुंबई : राज्यात सध्या शेतकरी अडचणी आहेत. शेतमालाला बाजारभाव कमी असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. आता सरकारने राज्यातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण चिंताजनक असल्याचे मान्य केले आहे. याबाबत धक्कादायक माहिती सरकारने दिली आहे.
गेल्या ५६ महिन्यांत दररोज सरासरी आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत, हे सरकारने मान्य केले आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील म्हणाले, की गेल्या ५६ महिन्यांत दररोज सरासरी आठ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिवाजीराव गर्जे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.
ते म्हणके, की शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागील कारणे आणि पीडित कुटुंबांना मदत करण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांचा उल्लेख मंत्र्यांनी केला. मंत्र्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये मराठवाडा विभागात ९५२, अकोल्यात १६८, वर्ध्यात ११२, बीडमध्ये २०५ आणि अमरावती विभागात १,०६९ शेतकऱ्यांनी आपले प्राण गमावले.
विधान परिषदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकरी आत्महत्येवर विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात हा धक्कादायक खुलासा केला आहे. या आकडेवारीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दुर्दशेबद्दल चिंता निर्माण झाली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले असून ही आकडेवारी चिंताजनक आहे.
दरम्यान, शेतकरी अडचणीत आहे. त्याच्या मालाला जोपर्यंत किंमत मिळणार नाही, तोपर्यंत तसेच प्रकार घडणार आहेत. सरकार कर्जमाफीबद्दल बोलतं, पण अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना कोणताही दिलासा दिलेला नाही. २०१० मध्ये पिकांचे भाव आजही तसेच आहेत, पण शेतीचा खर्च तिप्पट झाला आहे. अशा परिस्थितीत शेतकरी आपल्या कुटुंबाचे पोट कसे भरवू शकतात? असा प्रश्न निर्माण झाला आहे.