शेतकरी मदतीचा मोठा वाद!CM फंडात 100 कोटी जमा,75 हजारच शेतकऱ्यांना; मुख्यमंत्री कार्यालयाने मौन सोडलं..

पुणे : अतिवृष्टी, गारपीट आणि पिकावरील किडीने हैराण झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना सरकारकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा असताना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन तब्बल एक अब्जाहून अधिक रक्कम जमा असूनही शेतकऱ्यावरील खर्च मात्र अत्यल्प असल्याची माहिती उघडकीस आली आहे.ऑक्टोबर महिन्यात मुख्यमंत्री सहायता निधीत १०० कोटींची रक्कम आली असताना शेतकऱ्यांसाठी फक्त ७५ हजारांचा निधी दिल्याची माहिती समोर आल्यानंतर खळबळ उडाली.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यालयाने आरोप फेटाळून लावत स्पष्टीकरण दिले आहे.एकट्या ऑक्टोबर महिन्यातील आकडेवारी देऊन निव्वळ गैरसमज निर्माण होतात. याशिवाय ही माहिती सुद्धा चुकीची आहे. अशी चुकीची माहिती का देण्यात आली, याचीही चौकशी सुरू करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले.
मुख्यमंत्री सहायता निधीतून ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या काळात 61 कोटी 51 लाख 698 रुपये इतकी मदत वितरीत करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून दैनंदिन पातळीवर खर्च होतो. त्यामुळे दररोज या खर्चाची रक्कम ही वाढत असते. त्यामुळे फक्त एका महिन्याची माहिती सांगून निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल, असेही मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले.

गेल्या ऑक्टोबर महिन्यात १०० कोटींहून अधिक निधी जमा झाला. मात्र, प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचलेली मदत केवळ 75 हजार रुपये असल्याचे आरटीआय कार्यकर्ते वैभव कोकाट यांच्या मागणीतून उघड झाले. विरोधकांनी या मुद्यावर सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्वीट करत देवेंद्र फडणवीस यांना दानशूर राज्याचे कंजूष प्रमुख, म्हणत टोला लगावला आहे.

